Sunday, 12 July 2020

बरे झाले, पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले...

विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात होतो. परंतु विज्ञान सोबतच वाद-विवाद, वक्तृत्व, कविता, कथाकथन, एकांकिका असे एकंदरीतच कलेशी जास्त नाळ जोडली गेली होती. वसमत शहरातील बहिर्जी स्मारक महाविद्यालयाचा वादविवाद, वक्तृत्वचा वारसा देखील खुप मोठा होता.

त्यात योगदानाची संधी म्हणून अनेक स्पर्धांमध्ये महाविद्यालया मार्फत परगावी जायला लागलो. अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला.

वाचनाचीही आवड होती. त्यावर्षी अटलजींच्या कविता - 'मेरी इक्यावन कविताएँ' हे पुस्तक वाचले. खूप भारावून गेलो. शिवाय त्यांना प्रत्यक्ष पहायलाही मिळाले. अटलजी १९९९ च्या निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडला सभा घेण्याकरता आले होते. आणि याच निवडणुकीत ते पंतप्रधान देखील झाले.

त्यांचे एकंदरीतच सगळे व्यक्तिमत्व पाहून असे वाटायला लागले होते की, 'आपणही देशासाठी कार्य करावे. अगदी त्यांच्या प्रमाणे. आणि देशाचे पंतप्रधान देखील व्हावे'.

स्वप्नच ते. मग पाहायला काय हरकत आहे!

म्हणून मग पुढे वसमत शहरातील काही भाजपच्या वॉर्डांच्या बैठका किंवा एखाद्या भाजपच्या शाखेच्या उद्घाटन समारंभाला जायला लागलो. काही वेळेला सूत्रसंचालन देखील केले. एकंदरीतच खूप छान वाटत होते.

आणि हो. संघ शाखेतही अगदी नियमित होतो. सिद्धेश्वर सायं शाखेचा कार्यवाह म्हणून दायित्व होते. शाखा नियमित सुरू होती. त्यात खंड पडणे शक्यच नव्हते. कारण प्रेरणास्थान अटलजी. ते आधी स्वयंसेवक होते. नंतर प्रचारक झाले. आणि शेवटी भारताचे पंतप्रधान देखील झाले. कदाचित म्हणूनच.

पुढे संघ शिक्षा वर्ग प्रथमवर्षाकरिता (२००० साली)  पुण्याजवळील निगडी प्राधिकरणात जाणे झाले. प्राथमिक वर्ग होऊन खूप दिवस झाले होते. शिवाय तेव्हा बालही होतो. आता मात्र ऐन तारुण्यात देशभक्तीचे स्फुरण चढले होते. मी 'पंतप्रधान होण्याचे स्वप्न' माझ्या वहीत लिहून ठेवले होते.

परंतु 'संघ संस्कार' काही वेगळा व्हायचा होता.

त्यावर्षी अटलजींच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. सबंध देशभरात त्याची खूप मोठी चर्चा देखील सुरु होती. स्वाभाविकच प्रथम वर्षात देखील सगळ्या स्वयंसेवकांत ही चर्चा सुरु होती. 'आता भारताचे काय होणार? एवढ्या वर्षानंतर असे वेगळे व्यक्तिमत्व असलेले पंतप्रधान लाभले आहेत. त्यांना नाही चालता आले तर? त्यांना काही झाले तर...?'

अशी एकंदरीत सुरू असलेली ही चर्चा आणि काळजी ही बहुतेक वर्गात बौद्धिका करीता आलेल्या ज्येष्ठ कार्यकर्ते मा.मधुभाई कुलकर्णी (त्यावेळेस अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख) यांनी ऐकली असावी. ज्याचा समाचार त्यांनी बौद्धिकात घेतला.

आणि माझा दृष्टिकोन अगदी निर्मळ पाण्याप्रमाणे स्पष्ट झाला. 'मी' पासूनचा माझा प्रवास 'आम्ही' पर्यंत मधुभाईंनी नेऊन ठेवला. पंतप्रधान होण्याच्या स्वप्नाचा विचार तर मी सोडून दिलाच. आणि आजीवन स्वयंसेवक राहून संघ सांगेल ते कार्य करण्याचा संकल्प केला.

कारण मधुभाई बौद्धिकात म्हणाले, "काळजी करू नका. अटलजींना काही होणार नाही. आणि काही झालेच तरी संघाकडे असे अजून शंभर 'अटलजी' आहेत..."

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

Saturday, 18 April 2020

प्रवास


संभाजीनगर शहराच्या मासिक जिल्हा बैठकीचा समारोप विभाग प्रचारक श्री समीरजी क्षीरसागर यांनी करण्यास सुरुवात केली, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. म्हणाले, "मी एकटाच बोलणार नाही तर आपण सगळ्यांनीही आपले मत, विचार किंवा अनुभव एका वाक्यात मांडायचे आहे. आणि तो विषय म्हणजे 'आपला प्रवास' आणि शेवटी मी देखील माझा अनुभव एका वाक्यात मांडतो."

मग प्रत्येक जिल्हा कार्यकर्त्यांनी क्रमाने बोलायला सुरुवात केली.
'पूर्वनियोजित प्रवास',  'कार्यासाठीचा प्रवास', 'कार्यकर्त्यासाठीचा प्रवास',  'कार्यक्रमासाठीचा प्रवास',  'निवासी प्रवास', 'अन्य कार्य विभागासाठीचा प्रवास', 'उपक्रमाचा पाठपुरावा घेण्यासाठीचा प्रवास', असे वेगवेगळे चिंतन व अनुभवातून प्रत्येकाने आपले विचार मांडले.

आणि शेवटी समीरजी म्हणाले, "प्रवास स्वतःसाठी देखील असतो."

आणि बैठक संपली. स्वाभाविकच प्रत्येकजण आत्ममग्न झाला होता.

त्यानंतर बराच कालावधी उलटून गेला.

काही महिन्यांपूर्वी प्रांताच्या योजनेतून ठरलेल्या उपक्रमा अंतर्गत 'तालुका व्यापक बैठक' घेण्याकरिता परभणी जिल्ह्यात पुर्णेला जाणे झाले. बैठकीची पूर्वतयारी म्हणूनही प्रवास झाला. सगळी रचना झाली. आणि प्रत्यक्ष बैठकीच्या दिवशी मुक्कामी देखील गेलो.

सगळे सत्र ठरल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित पार पडले. अपेक्षित ती संख्यादेखील होती. आणि बैठक संपवून पुढच्या गाडीने संभाजीनगरला निघायचे होते. तर शहर कार्यवाह श्री हर्षल महाजन यांनी डबा नेण्याचा आग्रह केला. तसे पाहता दुपारी अडीच पर्यंत घरी पोहोचणार होतो. आणि न्याहारी देखील पोटभरून झाली होती. पण त्यांच्या आग्रहासमोर 'नाही' म्हणू शकलो नाही.

आणि त्यांनी डबा आणून दिला.
इथपर्यंत सगळे ठीक चालले होते पण हर्षलजींनी सोबत पाण्याची बाटली देखील दिली.
गोष्ट खूप साधी होती. पण मी पाहतच राहिलो. आजच्या धावत्या युगात 'पाणी काय कुठेही विकत घेता येते', असा आपला नेहमीच विचार असतो.

पण 'जेवताना ऐनवेळेला तहान लागल्यास काय?', कदाचित या भावनेने घरातील माऊलीने पाण्याची बाटली देखील दिली होती.

खरंतर त्या नुसत्या पाण्यानेच माझी भूक भागली होती. अगदी भारावलेल्या वातावरणात प्रवास झाला.

घरी आल्यानंतर आई-बाबा आणि पत्नीला हा प्रसंग सांगितला. आणि म्हणालो, "अशी कार्यकर्त्यांची काळजी घेणारे कार्यकर्ते आणि त्यांच्या घरातील माऊली असतात म्हणून आम्ही संघ काम करतो."

आणि मनातल्या मनात म्हणालो, "हा प्रवास स्वतःसाठीचा होता."

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

Friday, 6 December 2019

दायित्व सहकाऱ्यांचे


२०१० सालचा प्रसंग आहे. मी संभाजीनगर शहर शारीरिक शिक्षण प्रमुख म्हणून संघाचे काम करत होतो. हे दायित्व येऊन एकच वर्ष झाले होते. शारीरिक विभाग हा पूर्वीपासूनच आवडीचा राहिलेला विषय. म्हणून शारीरिक विभागाचे काम अधिक उत्साहाने करायचो. मग असेच एकदा शारीरिक विभागात संबंधित असलेला 'निवासी वर्ग' हा विषय शहरातील चारही भागांमध्ये घेण्यासाठी त्याकरिताची नियोजन बैठक ठरवली होती.

'निवासी वर्ग' हे संघ स्थापनेपासून बाल स्वयंसेवकांचे संघाचे प्रशिक्षण करण्याचे ठिकाण राहिलेले आहे. संघस्थानावर ज्या ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत, त्याचे शाखेवरील काही नियुक्त स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले जात असते. मग ते प्रशिक्षण शारीरिक व बौद्धिक असे दोन्ही प्रकारचे असते. पुढे मग हेच प्रशिक्षित स्वयंसेवक निवासी वर्गातील विषय शाखेवर घेत असतात. अर्थात पुढे सर्व स्वयंसेवकां पर्यंत विषय पोहोचतात. सर्वांचे प्रशिक्षण होत असते. अशी एकंदरीत निवासी वर्गाची रचना असते.

तर अशा प्रकारच्या रचनेकरिता आम्ही शारीरिक विभागातील सदस्यांसोबत बैठकीसाठी जमलो होतो. बैठकीस एक जेष्ठ कार्यकर्ते देखील उपस्थित होते. शारीरिक प्रमुख या नात्याने मी बैठक सुरू केली. सर्वांना म्हणालो, "शहरात चारही भागात आपल्याला निवासी वर्ग घ्यायचे आहेत. त्याची रचना करण्याकरिता आपण जमलो आहोत. तेव्हा प्रत्येकाने सांगावे, आपण कशी कशी रचना करू शकतो."

माझे बोलणे संपते न संपते तोच इतर कुणी बोलायच्या आधी सर्वांना उद्देशून ते जेष्ठ कार्यकर्ते म्हणाले, "पण निवासी वर्गाची आवश्यकता आहे का?"

त्यावर लगेच एक मंडळ सदस्य म्हणाला, "खरंच आहे. काहीच आवश्यकता नाही. आपण शाखेवर सगळ्या गोष्टी घेत असतोच. मग निवासी वर्ग कशाला?"

झालं. माझी काय चूक झाली आहे, ते मला त्या मंडळ सदस्याच्या उत्तराने कळाली. पुढचा सगळा वेळ मग 'निवासी वर्गाची आवश्यकता' या विषयाची चर्चा करण्यात गेला. निवासी वर्गाची रचना काही झालीच नाही.

तेव्हा पहिल्यांदा मला जाणवले, आपण करत असलेल्या कामाची स्पष्टता केवळ आपल्याला असून उपयोगाची नाही किंवा आपण आपल्या सहकाऱ्याला समजावून सांगूनही आपले दायित्व पूर्ण होत नाही.

संघाचे कार्य हे समाजाचे कार्य आहे. तेव्हा 'सहकाऱ्यांनी केले नाही', 'सहकाऱ्यांना समजले नाही' म्हणून आपल्या कार्यविभागाचे कार्य अपुरे आहे, असे म्हणता येत नाही.

तर आपल्या सहकाऱ्याला त्याच्या दायीत्वाची स्पष्टाता असणे, हे देखील एक प्रमुख म्हणुन आपलेच दायित्व असते.


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

Friday, 15 November 2019

कंगवा आणि समाजसेवा


वसमत शहरात बालांची शाखा सुरू झाली होती. एक साप्ताहिक मिलन सार्वजनिक वाचनालयाच्या पटांगणात ही सुरू झाले होते. दोन हजार एक सालची गोष्ट आहे. परंतु एवढ्या धिम्या गतीने काम करून कसे चालेल? असा सातत्याने प्रश्न पडायचा. त्यात एवढा मोठा समाज, त्याला आपण कसे पुरू शकतो? असेही वाटायचे. संघाचे काम अधिक गतीने कसे वाढेल किंवा वाढेल का? असे विचार मनात यायचे.

मग एके दिवशी वसमत शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.चंद्रसेन दिवाण यांना सहज भेटायला गेलो असताना, हा विषय निघाला. त्यावर डॉक्टर म्हणाले, "सगळेच संघात येतील असे नक्कीच होणार नाही. नव्हे तशी संघाची अपेक्षाही नाही. पण सगळेच समाजसेवी असावे, याचा आग्रह संघ नक्कीच करतो. म्हणून संघ समाजसेवेचे काम करतो."

आता मात्र मी आणखीनच बुचकळ्यात पडलो. एकीकडे सगळेच संघात येणार नाहीत, हे माहीत आहे. तर दुसरीकडे सगळे समाजसेवी व्हावे, ही अपेक्षा वास्तववादी वाटत नव्हती.

परंतु डॉ.दिवाण यांनी ज्येष्ठ प्रचारक मा.दामुअण्णा दाते यांनी सांगितलेला एक दाखला दिला, तेव्हा पटले.

डॉ.दिवाण म्हणाले, "दामुअण्णा दाते यांनी एका बैठकीत एक कंगव्याचे उदाहरण दिले. दामुअण्णा यांनी हातामध्ये एक कंगवा घेतला व सगळ्यांना उद्देशून म्हणाले, 'बघा हा कंगवा किती आकर्षक आहे. त्यावर नक्षीकाम सुंदर आहे. रंग मोहक आहे. हातात पकडायला एकदम छान आहे. त्यावरून बोटे फिरवली तर छान आवाज येतो.

परंतू... या कंगव्याने भांग पाडता येत नाही.
काही उपयोग आहे का मग या कंगव्याचा?

अगदी असेच व्यक्तीचे देखील आहे. त्या त्या व्यक्तीने आपआपल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे. यश, किर्ती, पैसा सर्व काही मिळवलेले आहे.

परंतु ती व्यक्ती समाजसेवी नाही. ती व्यक्ती त्या भांग न पाडता येणाऱ्या कंगव्याप्रमाणेच आहे."

तात्पर्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्ती निर्माणाचे कार्य शाखेच्या माध्यमातून करतो. मग तेच स्वयंसेवक अगदी प्रेरणेने समाजसेवेचे व्रत स्विकारत असतात.

पण समाज म्हणुन प्रत्येक व्यक्तीने संघटना कोणतीही असो, संस्था कोणतीही असो किंवा माध्यम कोणतीही असो जीवनातील काही भाग समाजकार्याला कोणत्यानाकोणत्या प्रकारे देणे व्यक्तीच्या व समाजाच्या, दोघांच्याही हिताचे आहे.

संदर्भ व संपर्कसूत्र :- डॉ.चंद्रसेन दिवाण - ९४२००८१७५५

©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

शाखा कार्यवाह


सिद्धेश्वर सायं शाखा सुरु होऊन पाच सहा महिने झाले होते. वसमत तालुका तोपर्यंत परभणी जिल्ह्यात होता. पण १ मे१९९९ या दिवशी हिंगोली जिल्ह्याची निर्मिती शासकीय दृष्ट्या झाली तसेच संघदृष्ट्या देखील झाली. आणि नविन जिल्ह्याला नविन जिल्हा प्रचारक श्री किरण शरद देशपांडे हे आले.

पाच सहा महिन्यातील एकंदरीत शाखेमध्ये खेळसूर्यनमस्कारसमता इत्यादी गोष्टी व्हायच्या. एक-दोन उत्सवही झाले. आणि संपर्काला जायचे म्हणजे शाखेला जात असताना स्वयंसेवकांना त्यांच्या घराच्या बाहेर हाक मारायची असेच व्हायचे. कारण एकाच गल्लीत अनेक वर्षांपासून रहात असल्यामुळे अनोळखी असं फारसं कोणी नव्हतं. म्हणून संपर्काचा असा प्रत्यक्ष अनुभव देखील कधी आला नव्हता. नव्हे तसे कुणाला संपर्क करताना पाहिले देखील नव्हते. पुढे किरणजींच्या निमित्ताने तो अनुभव आला. आणि अशा पद्धतीने त्यांनी अनुभव दिला कीती पद्धततो संपर्क आणि तो प्रसंग अगदी आजही डोळ्यासमोर स्पष्टपणे आहे.

वसमतला सलग दोन-तीन दिवसांसाठी किरणजी प्रवासाला आले होते. पहिल्या दिवशी शाखा झालीपण संपर्काचे काही माहीतच नसल्यामुळे शाखा झाल्यावर आम्ही माझ्या घरी गेलो. पण दुसऱ्या दिवशी एका स्वयंसेवकाकडे जायचे ठरले. तसा शाखेत त्याला निरोप दिला व संपर्क ही झाला. त्या स्वयंसेवकाची आणि त्याच्या वडीलांशी गप्पागोष्टी झाल्या. वैयक्तिक चौकशी झाली. अर्थात हे सगळं किरणजींनी केले व चहा घेऊन निघालो. पण त्या संपर्कानंतर किरणजी म्हणाले, "आता उद्या देखील संपर्काला जाऊया. पण उद्या मी सोबत तर असेणपण मी काहीच बोलणार नाही. तुलाच बोलावे लागेल."

मनातल्या मनात मला वाटले कीअसे कसे होईल. जिल्हा प्रचारक शांत कसे बसतील. आणि त्यात किरणजींचा स्वभाव खूप बोलका. म्हणून मी अगदी बिनधास्त होतो.

तिसऱ्या दिवशी शाखा झाली. ठरल्याप्रमाणे संपर्काला गेलो. त्या स्वयंसेवकाच्या घरातील बैठकीत तोत्याचे वडीलमी व किरणजी असे चौघेही बसलो होतो. आणि सांगितल्याप्रमाणे किरणजी काहीही बोलत नव्हते. मला काय बोलावे काही सुचत नव्हते. मी त्या स्वयंसेवकाशी किंवा त्याच्या वडिलांशी एक अक्षरही बोलू शकलो नाही. अगदी चहा संपेपर्यंत किरणजींकडे अपेक्षेने मी अनेक वेळा पाहिले कीआता बोलतील म्हणून. पण शेवटपर्यंत ते काहीही बोलले नाही.
अर्थात तो दिवस माझ्या प्रशिक्षणाचा होता. पण प्रशिक्षणाचा प्रकार खूपच अवघड होता.

दिवस निघून गेला. पण शाखा कार्यवाह म्हणून संपर्क कसा करायचायाची जाणीव झाली. म्हणून आता ठरवले,  सगळी काही ओळख असताना आपण बोलू शकलो नाही. पण आता संपर्क तर आलाच पाहिजे.

पुढे नित्य संपर्काला जायला लागलो.
पण प्रसंग एवढ्यावरच संपर्क शिकवून माझ्यासाठी थांबणार नव्हता. संघ कार्याच्या अलौकिक कार्य पद्धतीचा आणि दायित्वाचा शाखा कार्यवाह म्हणून अनुभव देखील यायचा होता.

एके दिवशी असाच संपर्काला गेलो असतानाएका पालकांशी गप्पा मारत होतो तर ते पालक सहज म्हणाले, "थोडंसं  तुम्ही आमच्या मुलाला अभ्यास करायचेही सांगा. कारण तो नुसता खेळत असतो."
उत्तरादाखल मी काही बोलू शकलो नाही. केवळ आश्चर्यचकीत झालो.

साधारण शिशु स्वयंसेवक ते दहावीपर्यंतचे बाल अशी शाखेतील एकंदरीत स्वयंसेवकांची उपस्थिती होती. आणि मी  विज्ञान शाखेच्या पदवीच्या पहिल्या वर्षात होतो. त्या बाल स्वयंसेवकाला अभ्यास करायला सांगणे खरंतर ही गोष्ट वरवर पाहता खूप सुखावणारी होती कीआपल्यात काहीतरी आहेअसं जाणवणार होती.
पण पुढे सलग पाच सहा दिवस संपर्काला गेलो असतानाहाच अनुभव आला.

आता मात्र लक्षात आले कीकाहीतरी गडबड आहे. कारण तसे पाहता पहिली ते बारावी या वर्षांमध्ये मी केवळ फर्स्टक्लास या श्रेणीत कायम पास होत आलेलो होतो.  डिस्टिंक्शन वा पहिल्या पाचमध्ये येणारा देखील मी कधी विद्यार्थी नव्हतो. मग अचानक अशा साधारण विद्यार्थ्याकडून पालक अपेक्षा का करताहेतयाचा खूप विचार केला. आणि विचारांती लक्षात आले कीया पालकांपैकी कुणीही  वैयक्तिकरित्या माझ्याकडून त्यांच्या पाल्याविषयी अपेक्षा ठेवत नव्हते. तर माझ्या मागे 'शाखा कार्यवाहहे बिरुद  लागले होतेत्या शाखा कार्यवाह कडून अपेक्षा ठेवत होते.

बहुतेक त्या सर्वच पालकांपैकी कुणीही शाखेत गेले नव्हते. संघ कार्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभव देखील त्यांना नव्हता. पण कदाचित गेल्या काही महिन्यात आपल्या पाल्याच्या वर्तणुकीतील झालेला बदल त्यांना जाणवलेला असावा.

संघकार्याच्या अलौकिक कार्य पद्धतीतून तयार झालेल्या 'शाखा कार्यवाहया दायीत्वाची पहिल्यांदा जाणिव झालीगांभीर्य अनुभवले.

संदर्भ व संपर्कसूत्र - 
श्री किरण शरद देशपांडेपूणे
९७६४३२८३८४


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

संपर्क रक्षाबंधनाचा


कल्पकतानिर्भीडपणा आणि मनाचा निर्मळपणा या जणू बालवयातील भगवंतांनी दिलेल्या देणग्या असतात. थोरा मोठ्यांनीही अचंबीत व्हावंअसं कार्य ही लहान मुल करतात. अशा वेळी केवळ त्यांच्याशी पूरक अशी योजना वडीलधाऱ्या मंडळींनी करायची असते.

आणि त्यातही याच बालवयात जर सामाजिक जीवनाची जोड दिली तर निश्चितच सामूहिक सामाजीक भविष्य उज्वल होतं.

आणि ह्याच गोष्टीचा अनुभव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करत असताना
वसमत शहरातील सिद्धेश्वर सायं शाखेच्या रक्षाबंधनाच्या उत्सवाच्या संपर्काच्या निमित्ताने आला.

२००१ सालची गोष्ट आहे. रक्षाबंधनाच्या संपर्कासाठी सिद्धेश्वर सायं शाखेची बैठक झाली. शासकीय  रुग्णालय आणि त्याच परिसरातील व्यापारी वर्ग व त्याला लागूनच असलेले पोलीस स्टेशन येथे संपर्कला जायचेअसे बैठकीत ठरले.
त्यानुसार दोन-दोन स्वयंसेवकांची रचनाही झाली. आणि असे आम्ही सगळेजण संपर्काला निघालो.

मी सरकारी रुग्णालयातील रुग्णांना राख्या बांधण्यासाठी गेलो. बाजारपेठेत काही स्वयंसेवक गेले. आणि दोन स्वयंसेवक पोलीस स्टेशन मध्ये गेले.

त्यात अजिंक्य शशिकांत देशपांडे हा इयत्ता सहावी शिकणारा एक बाल स्वयंसेवक होता. माझ्या दृष्टीने मुख्य पोलीस इन्स्पेक्टर साहेबांना राखी बांधली म्हणजे आपला संपर्क झालाअसे मला वाटत होते .

पण प्रत्यक्ष अजिंक्य राख्या बांधून आलातो सोबत वेगळाच अनुभव घेऊन.

सगळेजणं अनुभव सांगण्यासाठी जेव्हा जमलो तेव्हा अजिंक्य म्हणाला, "सगळ्या पोलिसांना राखी बांधलीपोलीस इन्स्पेक्टर साहेबांना देखील राखी बांधली. आणि बाहेर येत असताना शेजारच्या कोठडीत 'चोरबसलेला होतात्याला देखील राखी बांधली."
भितीसंकोच हे तर अर्थात नव्हतेच.

पण 'सर्वस्पर्शी', 'सर्वव्यापीसंघकार्य अशाच प्रकारच्या संपर्काने होईलयाची शब्दशः अनुभूती आली.

( संदर्भ व संपर्क सूत्र – श्री अजिंक्य शशिकांत देशपांडे (९४०३१९६९६४), वंदे मातरम् प्रभात शाखेचा स्वयंसेवक, डॉ.हेडगेवार नगर, संभाजीनगर शहर जिल्हा )


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

मंगळवार आणि हेडगेवार


पहिल्यांदाच गाव सोडून परप्रांतात नोकरीनिमित्त जाण्याचा योग आला, तो सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्रात. 2004 साल होते. आजपर्यंत संघाच्या संपर्कात वाढलो होतो. पण पहिल्यांदाच विश्व हिंदू परिषदेचा संबंध आला. तो माझा बालमित्र व विहिंपचा सातारा जिल्हा प्रचारक श्री अविनाश कुलकर्णी याच्यामुळे. शाळेनंतर प्रथमच जवळजवळ एक वर्ष सोबत रहायला मिळाले.

मग श्री बाबूजी नाटेकर, प.महा.विहिंप, प्रांत मंत्री यांचा परिचय झाला. नंतर काही वेळा भेटीही झाल्या.

आणि एकदा एका बैठकीचा निरोप मिळाला. श्री मिलींदजी परांडे, विहिंप केंद्रीय कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक मंगळवारी होती. बैठकीनंतर नाष्टया होता.
आणि मी मंगळवार कुलदेवतेचा दिवस म्हणून उपवास करायचो. आणि काही केल्या उपवास मोडायचा नाही, हा माझा संकल्प होता.

मला एक प्रकारे संकोच वाटला की, आता बैठकीला कसे जायचे? बाबूजींच्या घरीच बैठक होती. बैठकीनंतर नाष्टयाची व्यवस्थाही केली होती. आपल्यालाही नाष्टया करावे लागेल! संघ कार्य करत असताना, स्वयंसेवकाच्या घरी मिळेल ते खावे, आपल्याला केवळ 'हेडगेवार' असला पाहिजे. अशा समजूतीमध्ये मी होतो. अर्थात ही माझी धारणा होती. त्यामुळे मी मंगळवार सोडून संपर्क जायचो.

पण मग बैठकीलाही जायचे की नाही? हा माझ्या समोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला. कारण श्री मिलिंदजी परांडे यांचे वसमतला राष्ट्र जागरण अभियानामध्ये बौद्धिक ऐकायला मिळाले होते. खूप आवडले होते. म्हणून परत त्यांचा सहवास अनुभवण्याचा क्षण मला सोडायचा नव्हता.

मग योगायोगाने बाबूजींची भेट झाली. आणि न राहून माझी अडचण मी त्यांना सांगितली. क्षणाचाही विलंब न करता बाबूजी म्हणाले, "अरे संघाचे काय किंवा विहिंपचे काय, काम हे भक्तीचेच आहे. त्यामुळे तू तुझा उपवास मोडू नकोस, तू फक्त ये."

मी माझ्या मनाची तयारी करून गेलो. कारण बाबूजी म्हणाले होते, म्हणून. मग बैठक झाली. अर्थातच मिलींदजींनी मांडलेला विषय खूपच सुंदर होता. 
सगळ्यांचा परिचय झाला. मग सगळे नाष्टयासाठी बसले. आणि केवळ मला उपवासाचा फराळ देण्यात आला. उर्वरित सगळे कार्यकर्ते नाष्टया करायला लागले. मी मात्र आश्चर्यचकित झालो होतो. डोळ्यात पाणी यायचेच शिल्लक होते. माझ्याकडे काहीही जबाबदारी नव्हती. केवळ काही दिवसांचा परिचय होता. पण एका प्रांत मंत्र्यांनी अगदीच सामान्य स्तरावरच्या कार्यकर्त्याच्या आस्थेची घेतलेली ही सर्वोच्च काळजी होती. जी मी प्रत्यक्ष अनुभवली. अन्यथा बैठकीचा व्याप, केंद्रीय कार्यकर्त्यांचा प्रवास, बैठकीचे विषय, स्वत:च्याच घरच्या बैठकीची व्यवस्थेची तयारी, अशा कितीतरी गोष्टी होत्या. पण अगदी लक्षपूर्वक उपवासाच्या फराळाची त्यांनी व्यवस्था केली होती.

उद्देश एकच केवळ 'उपवास मोडला नाही पाहिजे' असेच नाही तर 'हेडगेवार' करत असताना 'मंगळवार' मोडल्या जात नाही, याचा अनुभव द्यायचा होता.

उपवासाने जेवढे पुण्य मिळेल असे वाटले होते, तेवढाच आनंद आणि धन्यता बाबुजींसारख्या देवदुर्लभ ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सहवासाने आणि त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे मिळाली.

आणि पहिल्यांदा अनुभवले, ऐकले होतेच संघकार्य ईश्वरी कार्य आहे ते बाबूजीं सारख्या कार्यकर्त्यांमुळेच...

संदर्भ व संपर्क सूत्र - श्री बाबूजी नाटेकर - ९८५००४३०२९


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

बरे झाले, पंतप्रधान होण्याचे स्वप्न भंगले...

विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात होतो. परंतु विज्ञान सोबतच वाद-विवाद, वक्तृत्व, कविता, कथाकथन, एकांकिका असे एकंदरीतच कलेशी जास्त नाळ जोडली गेली...